आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे एकत्रित शिष्टमंडळ १५ ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत बैठकीसाठी हजर झाले. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी, मतदार यादीतील गोंधळ आणि प्रशासनाच्या पक्षपाती कारभाराबाबत मुद्दे उपस्थित करण्यात आले. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील (शेकाप), बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई, अजित नवले उपस्थित होते. निवडणूक आयोगासोबत बैठक झाल्यानंतर मविआसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्रित वाय.बी.चव्हाण येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी शेवटच्या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिमिक्री देखील केली.
तुम्ही आजकाल महाविकास आघाडीसोबत दिसता या पत्रकारांच्या शेवटच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मला वाटतं मी २०१७ ला देखील दिसलो होतो. आता निवडणूक होणार, कशी होणार, हे महत्त्वाचं आहे, ती कोणासोबत होणार ते महत्त्वाचं नाही. तुमच्या लक्षात असेल कदाचित त्यावेळच्या पत्रकार परिषदेवेळी तुम्ही असाल तर मी २०१७ ला तेव्हा देखील मी हेच बोलत होतो. त्यावेळी अजित पवार देखील होते. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते. त्यावेळी ते सगळ्या गोष्टी सांगत पण होते, असंही पुढे राज ठाकरे म्हणाले.
काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगांच्या प्रतिनिधींना भेटलो. आज राज्य आणि केंद्री निवडणूक आयगाच्या प्रतिनिदीना भेटलो. निवडणूक म्हटलं की, राजकिय पक्ष आले मतदार आले.निवडणूक आयोग हे फक्त निवडणूक घेतात मात्र राजकिय पक्ष ते लढवतात. मात्र राजकिय पक्षांना निवडणूक आयोग यादया दाखवत नसेल तर इकडे घोळ आहे, असं राज ठाकरे म्हणाले. 2024 नंतर यादी जाहीर केली यात नाव आहेत फोटो नाही. दोघांना भेटलो हे आमच्यात येत नाही असं सांगतात. मतदार यादया न दाखवून काय भेटणार आहे? या मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका, असं राज ठाकरेंनी सांगितले. 5 वर्ष निवडणूका झाल्या नाहीत, आणखी 6 महिने नाही झाल्या, तर काय फरक पडतो. उद्या-परवामध्ये काय निर्णय घेतात ते पाहू, नंतर सर्व आम्ही आमचा निर्णय सांगू, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मतदारयादी गोपनीय असते की मतदान गोपनीय असतं?, सीसीटिव्ही आहेत ते हे बघु शकतात…मग आम्ही का नाही?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच या निवडणूक आयोगाच्या घोळावर मी 2017 ला ही पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषदेच्या याद्या आल्या 2022 च्या फोटोसकट याद्या आहेत. आताच्या याद्यांमध्ये फोटो नाही, असं राज ठाकरे म्हणाले. राजकीय पक्षाचं समाधान होत नाही तोपर्यत निवडणूका घेऊ नका, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. महायुतीच्या 232 जागा निवडून आल्यानंतरही संन्नाटा होता. निवडून आलेल्यांना ही तो धक्का होता, ही कोणती निवडणूक, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
राज ठाकरे म्हणाले की, 2024 मधील निवडणुकीची मतदार यादीमधील छोटासा तपशील वाचून दाखवतो. यामधून तुम्हाला किती घोळ आहे, याचा अंदाज येईल. मतदारसंघ कांदिवली पूर्व, नाव- धनश्री कदम, वडिलांचं नाव- दिपक कदम- वय 23 वर्षे…आता नाव दिपक कदम, वडिलांचं नाव-दिपक रघुनाथ कदम, वय-117 वर्षे…मतदार संघ 161 चारकोप- नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचं नाव- महेंद्र चव्हाण, वय-124 वर्षे, महेंद्र चव्हाण, वडिलांचं नाव- महेंद्र श्रीनाथ चव्हाण, वय-43 वर्षे…यावरुन कोणी कोणाला काढलंय हेच समजत नाहीय, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंसह, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात सर्व हसले. उपस्थित पत्रकारांमध्येही एकच हसा पिकला.














