भारतीयांचा इतिहास हा वीरता, शौर्य आणि बलिदानाने समृद्ध असून, शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर सिंगजी यांचे बलिदान केवळ एका पंथापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतीय समाजाच्या धर्मस्वातंत्र्य, संस्कृती आणि सभ्यतेच्या रक्षणासाठी होते, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथे आयोजित हिंद-दी-चादर शहिदी समागम कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, क्रूर औरंगजेबाने गुरु तेग बहादूर सिंगजी यांच्यावर धर्मांतरासाठी अमानुष दबाव आणला. मात्र गुरुजी सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गावर ठाम राहिले. अन्यायासमोर झुकण्यास नकार देत त्यांनी सनातन मूल्ये आणि भारतीय श्रद्धेच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. शारीरिक छळ, अमानवी यातना आणि शिरच्छेदासारख्या क्रूर शिक्षा देऊनही गुरुजींचा आत्मविश्वास आणि धर्मनिष्ठा डळमळीत झाली नाही, हे भारतीय इतिहासातील तेजस्वी उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगजेबाने गुरुजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊ नयेत, अशी बंदी घातली होती. मात्र लकीशहा बंजारा यांनी धाडस दाखवत चांदणी चौकात गुरुजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून मानवता, श्रद्धा आणि धैर्याचे महान उदाहरण समाजासमोर ठेवले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. पुढे त्यांनी गुरु गोविंद सिंगजी तसेच त्यांच्या चार साहिबजाद्यांच्या बलिदानाचाही उल्लेख करत सांगितले की, ही परंपरा भारतीय आत्मसन्मान आणि धर्मरक्षणाचा कणा आहे.
भारतीय समाज जेव्हा जातीभेद, उच्चनीचतेमुळे विखुरलेला होता, त्या काळात शीख गुरूंनी एकसंघता, बंधुभाव आणि निर्भयतेचा विचार समाजाला दिला. या विचारांनी समाजाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याची प्रेरणा दिली, असेही त्यांनी स्पष्ट केले. शालेय विद्यार्थी आणि युवकांपर्यंत भारताचा खरा इतिहास पोहोचवण्यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करत असून, गुरु तेग बहादूर सिंगजींच्या शहिदीचे महत्त्व घराघरांत पोहोचवले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
भारताची ओळख विविधतेतील एकतेवर आधारलेली असून, सर्वधर्मसमभाव हीच भारतीय राज्यघटनेची खरी आत्मा आहे. गुरु तेग बहादूर सिंगजींनी आपल्या बलिदानातून ही परंपरा अधिक दृढ केली, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला बाबा हरिनामसिंग, बलविंदर बाबाजी, उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महंत रघुमुनी, दिल्लीचे कॅबिनेट मंत्री मनिंदर सिरसाणी, बाबूसिंग महाराज, शरदराव ढोले, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, पंकजाताई मुंडे, अतुल सावे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार तुषार राठोड, आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासह अनेक आमदार, संत, महंत आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.














