राज्यात काही वर्षांपासून रखडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर आणि २० डिसेंबर असे दोन टप्प्यात मतदान झाले होते. रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांना धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांच्या कन्या, मंत्री आदिती तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या श्रीवर्धन नगर परिषदेत शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवाराने विजय मिळवला आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार नगर पंचायत आणि नगर परिषदांसाठी २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६७.६३ टक्के मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात एकूण २६३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींचा समावेश होता.
राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींमध्ये मतदानाची घोषणा केली होती. तरी, काही ठिकाणी मतदान पुढे ढकलण्यात आल्याने २ डिसेंबर रोजी केवळ २२२ नगर परिषदा आणि ४२ पंचायतींसाठीच मतदान पार पडले होते. दरम्यान, उर्वरित ७६ नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील १५४ प्रभागांमध्येही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. या भागांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरुड नगर परिषदेत सर्वाधिक ८८.४३ टक्के मतदान झाले होते. तर नागपूर जिल्ह्यातील बेसा पिपला येथे सर्वात कमी ५१.३३ टक्के मतदान झाले होते.















