सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. राकेश किशोर असे या वकिलाचे नाव आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं. त्यानंतर वकिलाला कोर्टाबाहेर काढण्यात आले. यावेळी या वकिलाने ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही’ असा आरडाओरडा केला. या घटनेनंतर आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने या वकिलाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यामुळे बार कौन्सिल ऑफ इंडियाने अधिवक्ता राकेश किशोर यांचे लायसन्स रद्द केले आहे. त्यामुळे राकेश किशोर यांना कोणतेही न्यायालय, न्यायाधिकरण किंवा न्यायाधिकरणासमोर वकिली करता येणार नाही. याचा अर्थ राकेश पुन्हा कधीही वकिली करू शकणार नाहीत. या एक कृत्याचा त्यांना मोठा फटका बसला आहे.
सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलावर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. आज सकाळी अटक केल्यानंतर पोलिसांनी राकेश किशोर यांना लगेच सोडून दिले. आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने या प्रकरणाची दखल घेत राकेश किशोर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली. त्यांना 15 दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, ज्यामध्ये त्यांना कारवाई का करू नये हे स्पष्ट करावे लागणार आहे. त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर कौन्सिल ऑफ इंडिया निर्णय जाहीर करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरन्यायाधीशांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्याशी मी बोललो. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशातील प्रत्येक नागरिक संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ही घटना निषेधार्ह आहे. अशा परिस्थितीला तोंड देताना न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या शांततेचे मी कौतुक करतो. त्यांचे कृत्य न्यायमूर्तींच्या मूल्यांप्रती आणि आपल्या संविधानाच्या आत्म्याला बळकटी देण्याप्रती त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते.’














