kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा’, संजय राऊतांचे मोठे विधान

राज्यात काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अनेक वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक हे दोन्ही नेते एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवतील का, यावरही चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता राज ठाकरे काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत हा मोठा गौप्यस्फोट केला. ‘महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला सुद्धा सोबत घेणे, अशी स्वत: राज ठाकरेंची इच्छा आहे. ही त्यांची भूमिका आहे. पण याचा अर्थ हा निर्णय नाही. कारण प्रत्येकाचे या राज्यात स्थान आहे. शिवसेनेचे आहे, डाव्या पक्षाचे स्थान आहे, तसेच काँग्रेसचेही स्थान आहे, असे विधान खासदार राऊतांनी केले. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी, आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे स्वतः स्पष्ट करतील, असं निक्षून सांगितलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी सावधपणे, आपण असं काही बोललो नसल्याचा मेसेज राज ठाकरेंना केल्याचं समजतं.

“महाविकास आघाडीमध्ये नवीन घटक पक्ष येणार असेल तर एकत्र बसून चर्चा करावी लागेल असे माझे म्हणणे आहे आणि काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत आहे. त्यांचे निर्णय दिल्लीत घेतले जातात. महाराष्ट्रातील सरकारमधील जे दोन पक्ष आहेत तेही त्यांचा निर्णय दिल्लीत घेतात. उद्याच्या शिष्टमंडळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सामील होणार आहेत, असंही खासदार राऊत म्हणाले.