राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात होत असलेल्या ‘नवे क्षितिज’ या व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रतिष्ठित व्यक्तींना संबोधत आहेत. दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता याठिकाणी झालेल्या कार्यक्रमांनतर मुंबईत ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी नेहरू सायन्स सेंटर, वरळी येथे सदर व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.
या दोन दिवसांत एकूण चार सत्रे होतील. पहिल्या दिवशी दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत दोन सत्रे होतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या कालावधीत दोन सत्रे होतील. पहिल्या दिवशी सरसंघचालकांचे व्याख्यान असेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपस्थितांसोबत प्रश्नोत्तराचे सत्र संपन्न होईल.
कोकण प्रांत संघचालक अर्जुन चांदेकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले, ‘विविध क्षेत्रांतील आमंत्रित केलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वं, साहित्यिक, वैज्ञानिक, वैद्यकीय व्यावसायिक, वकील, सामाजिक संस्था संचालक, शिक्षणतज्ज्ञ, विविध क्षेत्रातील कलाकार, खेळ क्षेत्राशी संबंधित लोक, मीडिया मालक आणि संपादक, धर्मगुरू, आर्थिक तज्ज्ञ, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, जाहिराती क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वे आणि महावाणिज्यदूत यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून निमंत्रणाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. गेल्या काही वर्षांत संघकार्यात सज्जन शक्तींचा सहभाग अनेकपटींनी वाढला आहे.
संघ शताब्दी वर्षात कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, स्व-बोध आणि पर्यावरण संरक्षण या पंच परिवर्तनावर विशेष भर देण्यात आला आहे. २०२५ च्या विजयादशमीपासून चालू झालेले शताब्दी वर्ष २०२६ च्या विजयादशमीपर्यंत असणार आहे. हे वर्ष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्राप्रती समर्पित सेवेच्या शतकाचे प्रतीक आहे. समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी गृह संपर्क, हिंदू संमेलन, प्रबुद्ध गोष्टी संमेलने, सद्भाव बैठक आणि युवा संमेलन यांसह अनेक प्रेरणादायी कार्यक्रमांची रचना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.














